उत्तर प्रदेशमधील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता अलहाबाद उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने करोनाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यातील पाच मोठ्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्याचे आदेश दिलेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रयागराज, लखनऊ, वाराणसी, कानपूर आणि गोरखपूरमध्ये २६ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे उत्तर प्रदेश सरकारच्या करोना नियोजनाला मोठा धक्का देणारा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे.

नक्की वाचा >> करोना काळात प्राण गमावणाऱ्या आरोग्य योद्ध्याचं विमा छत्र मोदी सरकारनं काढलं

अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आदेश जारी केला आहे. न्यायालयाने २०,२२,२३ आणि २४ एप्रिल रोजी न्यायालयाचं काम होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तसेच न्यायालयातील मुख्य खंडपीठाने आणि लखनऊ खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला. या कालावधीमध्ये प्रत्यक्षात किंवा ई-फायलिंगच्या माध्यमातून कोणताही अर्ज दाखल करुन घेतला जाणार नाही. राज्यामध्ये करोनाबाधितांची संख्या पाहून करोनाची साखळी तोडण्यासाठी उच्च न्यायालयाने हा आदेश दिल्याचं सांगण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> “करोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान मोदी दिवसातील १८-१९ तास काम करतायत, करोनावरुन राजकारण करु नका”

२६ एप्रिल रोजी केवळ आपत्कालीन प्रकरणांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी केली जाईल असं न्यायालयाने म्हटलं आहे. उच्च न्यायालयाने लखनऊ आणि प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्री कार्यालयाला लॉकडाउन लागू करण्याचे आदेश दिलेत. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजनचा योग्य पद्धतीने पुरवठा करण्यासंदर्भातीलही निर्देश न्यायालयाने दिलेत. करोना नियंत्रणासंदर्भातील उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या करोना सुरक्षा आणि नियोजनासंदर्भातील समितीने हे आदेश दिलेत. न्यायालयाचे रजिस्टार प्रोटोकॉल आशीष कुमार श्रीवास्त यांनी हे आदेश जारी केलेत.

नक्की वाचा >> कुंभ असो वा रमजान, कुठेच करोनासंदर्भातील नियम पाळले गेले नाहीत; शाह यांनी व्यक्त केली नाराजी

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू, लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेतल्याचं चित्र दिसत आहे. महाराष्ट्र, दिल्लीसारख्या राज्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले आहेत.  करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं आजच सहा दिवसांचा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून (१९ एप्रिल) ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे.