करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात आहे. अशातच पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. पंजाबमध्येही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या निहंगा टोळक्यानं कर्फ्यू पास मागणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीनं हातच कापला. यात इतर दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. पटियाळातील भाजी मंडई परिसरात ही घटना घडली.

महाराष्ट्राप्रमाणेच पंजाबमधील स्थितीही करोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अमलबजावणी सुरू केली. मात्र, दुसरीकडं पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. पटियालामध्ये निहंगा (परंपरेनं शस्त्र ठेवण्याची अनुमती असलेले निळा गणवेश परिधान करणारे) टोळक्यानं पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. निहंगांचा एक गट एका पांढऱ्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होते. यावेळी लॉकडाउन असल्यानं बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडले आणि पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्यानं एका सहायक पोलीस निरीक्षकाचा तलवारीनं हातच कापला. तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

रविवारी सकाळी ही घटना घडली. हरजित सिंह असे या सहायक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. हरजित सिंह यांना जवळच्या राजेंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना चंदीगढ येथे हलवण्यात आलं. पटियालाचे पोलीस उपअधीक्षक मनदीप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हल्ला केल्यानंतर हे टोळके घटनास्थळावरू फरार झाले. पोलिसांनी या टोळक्याचा पाठलाग केला. हे टोळके बलवाडा येथील एका गुरूद्वारात लपले होते.’ त्यानंतर या घटनेशी संबंध असलेल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हरजित सिंह यांच्यावर शस्त्रकिया करण्यात सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.