भारताकडून पाकिस्तानला आणि तेथील नागरिकांना कोणताही धोका नाही; मात्र, पाकपुरस्कृत दहशतवादापासून भारताला धोका असल्याचा स्पष्ट शब्दांत इशारा देणारा ठराव बुधवारी लोकसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. 
गेल्या आठवड्यात पूंछमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पाच भारतीय जवान शहीद झाले होते. शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानी जवानांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करणारा ठराव बुधवारी लोकसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी या ठरावाचे वाचन केले आणि सदस्यांनी बाके वाजवून त्याचे समर्थन केले. पाकव्याप्त काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असल्याचा पुनरुच्चार या ठरावामध्ये करण्यात आला आहे. नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीच्या कराराचे पाकिस्तान भविष्यात पालन करेल, अशी अपेक्षा ठरावामध्ये व्यक्त करण्यात आलीये.