लोकसभेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी लोकसभा सचिवांनी गुरुवारी खासदार शिशिर अधिकारी, सुनिल कुमार मंडल आणि के रघु रामा क्रिष्णनम राजू यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस पक्ष बदल कायद्यांतर्गत बजावण्यात आली आहे. तिन्ही खासदारांना १५ दिवसांच्या आत या नोटीशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी शिशिर अधिकारी आणि सुनील कुमार मंडळ यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. तर वायएसआरसीचे खासदार रघु रामा क्रिष्णनम राजू यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी पक्षाने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता लोकसभा सचिवांनी तीन खासदारांना नोटीस पाठवली आहे. राजू हे वायएसआरसी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पार्टी विरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती होती. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसनं लोकसभा अध्यक्षांकडे पक्ष बदल कायद्यांतर्गत मंडल आणि अधिकारी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. Lok Sabha Secretariat issues letters to MPs Shishir Adhikari, Sunil Kumar Mandal & K Raghu Rama Krishna Raju in response to petitions received under Anti-Defection Law. They have been asked to give their comments within 15 days of receipt of letters: Sources — ANI (@ANI) July 15, 2021 पश्चिम बंगालमधील पूर्व बर्डवन लोकसभा क्षेत्रातून मंडल हे तृणमूलच्या तिकिटावर खासदार झाले होते. मात्र गेल्यावर्षी गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तर पूर्व मिदनापूरमधून खासदार असलेले शिशिर अधिकारी यांनी मार्चमध्ये भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या मुलगा शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केलं होतं. नंदीग्राममध्ये जवळपास दोन हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. आता पश्चिम बंगालमध्ये मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.