याच संदर्भात 'लोकसत्ता'ने वाचकांचे मत जाणून घेण्यासाठी फेसबुक तसेच ट्विटवरून पोल घेतला. यामध्ये वाचकांना 'इंधनाचे दर कमी करणे सरकारच्या हाती नाही, हा भाजपाचा दावा पटतो का?' असा प्रश्न विचारला. या फेसबुक तसेच ट्विटर पोलमध्ये दोन हजार ७०० हून अधिक वाचकांनी आपले मत नोंदवले. मत नोंदवलेल्या वाचकांपैकी ७७ टक्क्यांहून अधिक वाचकांनी आपल्याला भाजपाचा हा दावा पटलेला नसल्याचे सांगत मोदी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तर २५ टक्के वाचकांनी आपल्याला इंधनाचे दर कमी करणे सरकारच्या हाती नसल्याचे मत पटत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकवर घेण्यात आलेल्या पोलमध्ये दोन हजार ४००हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले आहे. त्यापैकी ७५ टक्के म्हणजेच १ हजार ७०० हून अधिक वाचकांनी नकारात्मक मत नोंदवले आहे. तर २५ टक्के वाचकांनी म्हणजेच ६०४ वाचकांनी या संदर्भात सकारात्मक मत नोंदवत भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. दुसरीकडे ट्विटवरील पोलमध्ये ३५२ जणांनी या संदर्भात आपले मत नोंदवले. त्यापैकी ८० टक्के लोकांनी म्हणजेच २८२ जणांनी नकारात्मक मत नोंदवले आहे. तर उर्वरित ६० जणांनी सकारात्मक मत नोंदवत भाजपची बाजू बरोबर असल्याचे मत नोंदवले आहे. #LoksattaPoll: इंधनाचे दर कमी करणे सरकारच्या हाती नाही, हा भाजपाचा दावा पटतो का? — LoksattaLive (@LoksattaLive) September 11, 2018 मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून देशहिताचेच निर्णय घेतले. मात्र आता इंधन दरवाढीमागे सरकारचा काहीही हात नाही. यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. जनतेलाही हे ठाऊक आहे. म्हणूनच काँग्रेस आणि विरोधकांच्या बंदला जनतेने फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याचा दावा रविशंकर प्रसाद यांनी केला होता. मात्र 'लोकसत्ता'च्या पोलमधून जनतेला भाजपचे हे मत पटलेले दिसत नाही.