गुजरात सरकारमधील एका मंत्र्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यााबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी भगवान शंकराचा अवतार असल्याचा दावा करतात. त्यामुळे राहुल गांधींनी विष प्राशन करुन ते भगवान शंकराचा अवतार आहेत हे सिद्ध करुन दाखवावं असं विधान या मंत्र्याने केलं आहे. गुजरातचे आदिवासी विकास मंत्री गणपत वासावा सूरत बारडोली येथे एका सभेला संबोधित करत होते.

५०० ग्रॅम विष प्राशन केल्यानंतर राहुल गांधी जिवंत राहिले तर ते शिवाचा अवतार आहेत हे मान्य करता येईल असे गणपत वासावा म्हणाले. काँग्रेस पक्षाचे लोक राहुल गांधी शिवाचा अवतार असल्याचा दावा करतात. लोकांना वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी विष प्राशन केले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला ५०० ग्रॅम विष प्राशन करायला लावले पाहिजे असे वासावा म्हणाले.

विष प्राशन केल्यानंतर ते वाचले तर आम्ही सर्व राहुल गांधी भगवान शंकराचा अवतार असल्याचे मान्य करु असे वासावा म्हणाले. गुजरातमधील मंत्र्याच्या वक्तव्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून हे वक्तव्य दुर्देवी असून त्यातून भाजपाचे खरे चरित्र दिसते अशी टीका काँग्रेसने केली. लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने निराश होऊन ते अशी वक्तव्ये करत आहेत असे गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोषी यांनी केले.