निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच रंगल्याचे दिसत आहे. सोमवारी राहुल गांधी यांनी भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये रोड शो करुन आपल्या ताकदीचा अंदाज घेतला. यादरम्यान त्यांनी पनामा पेपर आणि व्यापम घोटाळ्याचा उल्लेख करत शिवराज आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांच्यावर हल्लाबोल केला.

आपल्या मुलावर राहुल गांधी यांनी आरोप केल्यामुळे शिवराजसिंह चौहान चांगलेच भडकले असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसकडून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर बेबनाव आरोप करत आहेत. आम्ही सर्वांचा मान ठेवत मर्यादा राखतो. पण आज तर राहुल गांधी यांनी माझा मुलगा कार्तिकेय याचे नाव पनामा पेपर्समध्ये आल्याचे सांगून कहर केला आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी राज्याची आर्थिक राजधानी इंदूर येथे रोड शो केला. राहुल यांच्या रोड शो दरम्यान अनेक ठिकाणी ‘हर हर महादेव’च्या घोषणा देण्यात आल्या.

इंदूरच्या दुकानदारांना गब्बर सिंह टॅक्सचा (जीएसटी) फायदा झाला का, असा सवाल करत या कर प्रणालीमुळे छोटे व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्याचे म्हटले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आल्यानंतर ‘योग्य जीएसटी’ सादर केले जाईल. याअंतर्गत ‘एक कर’ आणि ‘कमी कर’ ही भ्रष्टाचारमुक्त प्रणाली अंमलात आणणार असल्याचे सांगितले. मागील १५ वर्षांत भाजपा सरकारने काहीच केले नाही. उलट व्यापक, इ-टेंडरिंगसारखे घोटाळे झाल्याचा आरोप त्यांनी केला.