एका स्थलांतरित मजुराने पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली आहे. मध्य प्रदेशच्या छत्तरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पती क्वारंटाइनमध्ये असताना हा प्रकार घडला. बेपत्ता झालेली महिला तीन मुलांची आई असून पोलिसांनी तक्रार नोंदवून शोध सुरु केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

५० वर्षीय मजूर १९ मे रोजी मुंदेरीमधील आपल्या गावी पोहोचला. दिल्लीमध्ये एका बांधकाम साईटवर तो काम करायचा. पत्नी आणि मुले त्याच्यासोबतच राहत होती. पण दीडवर्षांपूर्वी पत्नी मुलांना घेऊन गावी निघून आली. श्रामिक स्पेशन ट्रेनने गावी पोहोचल्यानंतर तो घरामध्येच १४ दिवसांसाठी होम क्वारंटाइन झाला होता.

आणखी वाचा- …तर जोडीदारासोबतचे खासगी चॅट, फोटो पुरावा म्हणून सादर करा; ‘या’ देशातील पोलिसांचा आदेश

घरामध्ये तो पहिल्या मजल्यावर राहत होता, तर पत्नी आणि मुले तळ मजल्यावर राहत होती. २४ मे रोजी सकाळी तो दरवाजा उघडायला गेला, त्यावेळी रुम बाहेरुन बंद करण्यात आलेली होती. कसाबसा तो रुमच्या बाहेर आला, त्यावेळी पत्नी कुठेही दिसली नाही. मुलांना सुद्धा त्यांची आई कुठे गेलीय याबद्दल काहीही माहित नव्हते. मजुराने नोंदवलेल्या तक्रारीमध्ये हे सर्व म्हटले आहे. त्यानंतर त्याने चेहऱ्याभोवची चादर गुंडाळली व शेजारी, नातेवाईकांच्या दारावर जाऊन पत्नीला कुठे पाहिले का? म्हणून चौकशी करत होता.