राज्यात मागील कित्येक दिवसांपासून रुग्णसंख्येची वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजाराच्या सरासरीन रुग्ण आढळून येत असतानाच शुक्रवार रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून, केंद्र सरकारही सावध झालं आहे. केंद्र सरकारने पंजाब आणि महाराष्ट्रातील करोना प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी पावलं टाकण्यास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मोठ्या कालावधीनंतर पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. ही पथकं राज्य सरकारांसोबत करोना परिस्थितीवर नजर ठेवण्याबरोबरच संक्रमण नियंत्रण आणि साखळी तोडण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना मदत करणार आहे.

राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे शहर ८४९, पिंपरी-चिंचवड ५४९, उर्वरित पुणे जिल्हा ३६९, नाशिक शहर ३५२, जळगाव जिल्हा ५४०, सातारा २१४, औरंगाबाद ३१८, अकोला १४८, अमरावती शहर ४३५, यवतमाळ २५१, वाशिम २०७ नवे रुग्ण आढळले.