देशात करोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. लॉकडाउनच्या काळातील बंधनं शिथिल केल्यानंतर रस्त्यांवर गर्दी होऊ लागल्यानं करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील १० राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येऊ लागले असून, यात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

देशातील करोना रुग्णसंख्येचा दैनंदिन आलेख वेगानं वाढताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत ४४ हजार ५९ आढळून आले आहेत. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या संसर्ग वाढला असून, अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यास सुरूवात झाली आहे.आरोग्य मंत्रालयानुसार देशातील १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत एकूण रुग्णांपैकी ७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६ टक्के मृत्यूही या दहा राज्यांमध्ये झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू दिल्लीतच झाले आहेत.

आणखी वाचा- देशात पुन्हा लॉकडाउन? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक

नवी रुग्णसंख्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ९१ लाख ३९ हजार ८६६ इतकी झाली आहे. यात ८५ लाख ६२ हजार ६४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४१ हजार २४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ४ लाख ४३ हजार ४८६ रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील एकुण मृतांचा आकडाही १ लाख ३३ हजार ७३८ वर पोहोचला आहे.

मागील २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेली राज्ये

दिल्ली-६,७४६

केरळ-५,२५४

महाराष्ट्र-५७५३

पश्चिम बंगाल-३,५९१

राजस्थान-३,२६०

उत्तर प्रदेश-२,५८८

हरयाणा-२,२७९

छत्तीसगढ-१,७४८

तामिळनाडू-१,६५५

आंध्र प्रदेश-१,१२१