उत्तराखंडमध्ये निसर्गाच्या प्रकोपात बळी पडलेल्या महाराष्ट्राच्या गरजू प्रवाशांना राज्यात परतण्यासाठी हातखर्चाला प्रत्येकी दोन हजार रुपये आणि प्रवासभाडय़ासाठी आवश्यक पसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
नवी दिल्ली येथील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदन, तर डेहराडून येथील राजापुरा रोड आपत्ती निवारण कक्षातून हा निधी वितरित केला जाईल. दिल्लीतील महाराष्ट्राचे प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त बिपिन मल्लिक यांनी ही माहिती दिली. डेहराडून येथे अप्पर निवासी आयुक्त प्रदीप कुमार (भ्रमणध्वनी ०९८९८१४०६६३) यांच्या नेतृत्वाखाली राजापुरा रोड येथे तर नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनामध्ये जनसंपर्क अधिकारी प्रवीण टाके (भ्रमणध्वनी ०९७१७१४०४९५) यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती निवारण व समन्वय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील हे केंद्र कोपíनकस मार्ग, मंडी हाऊस नजीकच्या महाराष्ट्र सदनात असून याच ठिकाणाहून रोख रकमेची मदत मिळेल.    
डेहराडूनहून दिल्ली येथे पोहचणाऱ्या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिल्ली व हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावर महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे सहायता केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. गरजू प्रवाशांनी तेथील सहाय्यता केंद्राकडून मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  व्यवस्थापक नितीन गायकवाड (भ्रमणध्वनी ०८४४७३३१६६०) यांच्याशी संपर्क साधावा.