देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोनाचा हा वाढता फैलाव लक्षात घेऊन, राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने चार राज्यातून येणाऱ्या हवाई प्रवाशांसाठी SOP लागू केली आहे.

महाराष्ट्र सरकारने चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या चार राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणी सक्तीची केली आहे.

राजधानी दिल्लीत करोनाची तिसरी लाट आली आहे. दररोज तिथे करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहेत. “दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या हवाई प्रवाशांना महाराष्ट्रातील विमानतळावर उतरल्यानंतर RT-PCR रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे. नियोजित प्रवासाच्या ७२ तास आधी ही चाचणी करावी लागेल” असे महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या SOP मध्ये म्हटले आहे.

काय आहे ही SOP
– दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट असला पाहिजे. म्हणजे त्यांना करोना टेस्ट बंधनकारक आहे.
– महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल.
– ज्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल.
– चाचणीनंतर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
– ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.