सिमला जिल्ह्य़ातील कुफ्री येथील तुफान बर्फवृष्टीत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील ९० विद्यार्थ्यांसह एकूण १७० विद्यार्थ्यांची शनिवारी सकाळी सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या विद्यार्थ्यांमध्ये राजस्थानातील ८० विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये सहलीसाठी आलेले हे विद्यार्थी शुक्रवारी सायंकाळी कुफ्री येथे झालेल्या तुफान बर्फवृष्टीत अडकले, असे सिमल्याचे पोलीस अधीक्षक ओमपती जमवाल यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस मनाली येथे जात असताना कुफ्रीजवळच्या फागू येथे घसरली आणि हे विद्यार्थी बर्फात अडकून पडले, असे जमवाल यांनी सांगितले. त्यानंतर धल्ली पोलिसांच्या पथकाने या विद्यार्थ्यांची सुटका केली आणि त्यांना जवळच्या रिसॉर्टवर सुरक्षित स्थळी नेले. सध्या हे विद्यार्थी तेथे आहेत.