पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धुळ चारत मोठा विजय मिळवला. ममता यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, आज (सोमवार) ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथ ग्रहण सोहळा आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात ४३ मंत्री सामील होणार आहेत. ममता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी आपला तिसरा कार्यकाळ सुरू करतील. या मंत्रीमंडळात २५ जुने चेहरे आणि १८ नवीन सदस्य असतील. यातील, ४३ पैकी नऊ राज्यमंत्री असतील. शपथविधी सकाळी १०:४५ वाजता राजभवनात होईल. राज्यपाल जगदीप धनकर सर्व मंत्र्यांना शपथ देतील.

या सोहळ्यात अमित मित्रासह दोन मंत्री आभासी शपथ घेतील. मित्रा अस्वस्थ आहेत आणि ब्रात्या बोस कोविड -१९ संसर्गापासून बरे होत आहेत. सुब्रत मुखर्जी, पार्थ चटर्जी, फरहाद हकीम, अरुप विश्वास, सुजित बोस, चंद्रिमा भट्टाचार्य आणि शशी पंजा पुन्हा मंत्री होणार आहेत.

तसेच मानस भुयान हे राज्यसभेचे खासदार होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुका लढवल्या. तेही आता मंत्रिमंडळात असतील. पूर्व मिदनापूरचा अखिल गिरी आणि हावडाचे अरुप रॉय यांनाही संधी मिळणार आहे. पहिल्यांदा संथाली सिनेमाचा स्टार बीरबहा हंसदा हे राज्यमंत्री होणार आहेत. माजी आयपीएस अधिकारी हुमायूं कबीर यांचे नावही मंत्र्यांच्या यादीत आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची टक्कर असल्याचे सांगितले जात होते, परंतु ममता यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाने सर्व अंदाज खोटे ठरवत २९२ पैकी २३१ जागा जिंकल्या. भाजपाला केवळ ७७ जागा मिळाल्या.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लगेचच सूत्रं हातात घेत पोलीस प्रशासनात मोठे बदल केले आहेत. ममता बॅनर्जी यांनी जवळपास २९ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या आधी या अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा राज्यात आणण्यात आलं आहे त्यामध्ये महासंचालक विरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जावेद शमीम आणि महासंचालक (सुरक्षा) विवेक सहाय यांचा समावेश आहे.