पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आपलं धरणं आंदोलन मागे घेतलं आहे. हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जी यांची आज भेट घेत सर्व विरोधकांना तुमचा पाठिंबा असून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यासोबतच ममता बॅनर्जी यांची विरोधकांसोबत फोनवर चर्चाही झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर ममता बॅनर्जी यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

 

आंदोलन मागे घेण्याची घोषणा करत असताना ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, ‘हे धरणे आंदोलन राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे आपण धरणे आंदोलन थांबवत आहोत. न्यायालयाने आज सकारात्मक निर्णय दिला. पुढील आठवड्यात दिल्लीत हा मुद्दा आम्ही पुन्हा उपस्थित करु’. मिळालेल्या माहितीनुसार, 13, 14 फेबुवारीला दिल्लीत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारला राज्यासहित सर्व यंत्रणांवर आपलं नियंत्र ठेवायचं असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा देऊन पुन्हा गुजरातला परतावं. तिथे एक व्यक्ती एक ससकार आहे असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शारदा चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी तपास करण्यासाठी रविवारी संध्याकाळी सीबीआयचे पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र त्यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलं. बंगाल पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मध्यरात्री त्यांची सूटका केली. त्यानंतर स्वतः ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनाला सुरूवात केली.

पश्चिम बंगाल सरकार आणि सीबीआयमधील वादावर सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना अटकेपासून संरक्षण दिले असतानाच पश्चिम बंगाल सरकारने राजीव कुमारांवर शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना हे पत्रक पाठवले आहे.

चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याचे नाट्य रविवारी घडले. केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांचे पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील या राजकीय युद्धाच्या भडक्याने देशभरात खळबळ उडाली. मध्य कोलकात्यातील लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असेच होते. यावेळी पश्चिम बंगाल पोलीस आणि सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमकींच्याही अनेक फैरी झडल्याचे सूत्रांनी सांगितले. हा वाद सुप्रीम कोर्टातही पोहोचला होता. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राजीव कुमार यांना चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना अटकेपासूनही संरक्षण दिले होते.