“पश्चिम बंगालमधील ७० लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. कारण, बंगाल सरकारच्या राजकीय कारणांमुळे त्यांच्या राज्यांमधील शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नाहीत.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. तसेच, “जर तुमच्या हृदयात शेतकऱ्यांसाठी एवढं प्रेम होतं. तर मग बंगालमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी का आंदोलन केले नाही? का कधीच आवाज उठवला नाही?” असे प्रश्न देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केले.

केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला . तसेच, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेतले. यावेळी शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाच्या मुद्यावर बोलत असताना, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह डाव्या पक्षांवर निशाणा साधल्याचे दिसून आले.

आणखी वाचा- पंतप्रधान मोदींच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील शेतकरी गणेश भोसलेंनी दिलं ‘हे’ उत्तर

आणखी वाचा- शेतकरी त्याचे उत्पादन हवे तिथे विकू शकतो, मग सुधारणांमध्ये चूक काय? – पंतप्रधान मोदी

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू झाली आहे, तेव्हापासून १ लाख १० कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. १८ हजार कोटींपेक्षा जास्त रुपये काही क्षणात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु मला आज या गोष्टीचं वाईट देखील वाटत आहे की, संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे, सर्व विचारधारांची सरकारं याच्याशी जुडलेली आहेत. मात्र एकमेव पश्चिम बंगालमधील ७० लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव, या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ते हे पैसे घेऊ शकत नाहीत. कारण, बंगाल सरकारच्या राजकीय कारणांमुळे त्यांच्या राज्यांमधील शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नाही. ममता बॅनर्जी यांचे १५ वर्षांपूर्वींची भाषणं ऐकली तर कळेल की त्यांच्या राजकीय विचारधारेमुळे बंगालचे किती नुकसान झाले आहे. जर तुमच्या हृदयात शेतकऱ्यांसाठी एवढं प्रेम होतं. तर मग बंगालमध्ये शेतकऱ्यांना न्याय देणयासाठी, शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे यासाठी का आंदोलन केले नाही? का कधीच आवाज उठवला नाही. आणि आता तिथून उठून पंजाबला पोहचलात. आपल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना राजकारण आडवं येतं व आता दिल्लीत आंदोलनासाठी जात आहेत.”

पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांसोबत संवाद, नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले १८ हजार कोटी

तसेच, “स्वार्थाच्या राजकारणाचे एक उदाहरण सर्वांनाच दिसत आहे. जे पक्ष पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या हिताबद्दल काहीच बोलत नाही. ते इथं दिल्लीतील नागरिकांना त्रास देण्याच प्रयत्न करत आहेत, देशाचे अर्थकारण बिघडवण्यासाचा प्रयत्न करत आहेत आणि ते देखील शेतकऱ्यांच्या नावावर. मी त्यांना म्हणतो इथं फोटो काढण्यापेक्षा केरळमध्ये आंदोलन करून तिथं एपीएमसी सुरू करा. पंजाबच्या शेतकऱ्यांना भरकटवण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे. केरळमध्ये ही व्यवस्था नाही, जर ही व्यवस्था चांगली आहे, तर मग केरळमध्ये का नाही. हा दुटप्पीपणा का? हे कशाप्रकारचे राजकारण करत आहात? ज्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.” असं देखील पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.