पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी संध्याकाळी पूल कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. पण  राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी पोहोचू शकलेल्या नाहीत. ममता बॅनर्जी दार्जिलिंगच्या दौऱ्यावर आहेत. दार्जिलिंगहून संध्याकाळच्या वेळी कोलकाताला परतण्याची विमान सुविधा नसल्यामुळे त्या घटनास्थळी पोहोचू शकलेल्या नाहीत.

दक्षिण कोलकातामधील माजेरहाट पूलाचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. बेहाला – इकबालनगरला जोडणाऱ्या या पुलाचा एक भाग कोसळला असून अनेकजण खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा पूल ६० वर्ष जुना आहे.

पूल कोसळण्याची घटना चिंताजनक असून घटनास्थळी काम करणाऱ्या बचावपथकाकडून मी माहिती घेत आहे. मला लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचायचे आहे. पण संध्याकाळच्यावेळी दार्जिलिंगमध्ये विमानसेवा बंद असल्यामुळे थांबण्याशिवाय काहीही पर्याय नाही असे ममता बॅनर्जी यांनी म्हले आहे.

मदत आणि बचाव कार्यावर आपल्या संपूर्ण टीमने लक्ष केंद्रीत केले आहे. बचावाला आपले पहिले प्राधान्य आहे. या दुर्घटनेची नंतर चौकशी केली जाईल असे बॅनर्जी म्हणाल्या. कोलकाता शहरात तीन वर्षात पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. त्यावेळी २६ जणांचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी बचाव पथकासहित रुग्णवाहिका उपस्थित आहेत. सोबतच जवळच लष्कराचं रुग्णालय असल्याने त्यांची मदत घेतली जात आहे. विवेकानंद फ्लायओव्हर दुर्घटनेच्या दोन वर्षांनी ही दुर्घटना झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकातामध्ये निर्माणधीन विवेकानंद फ्लायओव्हर कोसळला होता. या दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला होता.