‘हॅलो साहेब..! मला अटक अटक करा, मी माझ्या बायकोला जीवे मारले आहे.’ मध्यरात्री अचानक १०० क्रमांकावर आलेल्या फोनमुळे पोलीस देखील चकित झाले. नवी दिल्लीतील आदर्श नगरमध्ये ही घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने घरात असलेल्या पाच किलो वजनाच्या सिलिंडरने डोक्यावर मारत पत्नीचा जीव घेतला. घटनास्थळी पोहचल्यानंतर तेथील स्थिती पाहून पोलिसांना धक्काच बसला.

बेडवर रक्ताने माखलेल्या अवस्थेत महिला होती. जखमी अवस्थेत असलेल्या महिलेच्या शेजारीच सिलेंडर पडला होता. आणि जवळ त्या महिलेचा पती बसला. पोलिस घटनास्थळी पोहचताच त्यांना धक्का बसला. त्यातून सावरत त्यांनी प्रथम महिलेला जवळील रूग्णालयात दाखल केले. पण रूग्णलयातील डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या व्यक्तीला अटक केली.

आदर्श नगरचे पोलीस उपायुक्त अस्लम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव कविता (२६) असे होते आणि तिच्या पतीचे नाव सुनील शर्मा (२६) असे आहे. त्यांना एका ४ वर्षांची मुलगीदेखील आहे. सुनील हा मूळचा अलिगड येथील रहिवासी आहे. सुनील याला आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबध असल्याचा संशय करत होता. संशयातून सुनीलने पत्नीची निर्घुण हत्या केली. सोमवारी मध्यरात्री सुनिल आणि कविता यांच्यामध्ये याच कारणाणुळे भांडण सुरू झाले. मध्यरात्री दोनच्या सुमारास सुनीलनं पत्नीच्या डोक्यात पाच किलोचा सिलिंडर घातला. या घटनेत कविताच्या डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आणि तिने जीव सोडला. घरांमध्ये कुलर सुरू असल्यामुळे काय झाले हे आजूबाजूंच्या समजले नाही. पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिल्यानंतर सुनीलने पोलिसांना फोन केला. ज्यावेळी पोलिस घटनास्थळी आले त्यावेळी सर्वांना ही घटना समजली.