संसार म्हटलं की भांड्याला भांड लागतंच… असं आपण नेहमी ऐकत आलोय. पण, याचं किरकोळ वादातून कधी काय होईल सांगता येत नाही. अशीच एक घटना घडली आहे मध्य प्रदेशात. कुटुंबातील शुल्लक भांडणातून वैतागलेल्या नवऱ्याने बायकोची अंगठ्यासह तीन बोटंच तोडली. बैतूल जिल्ह्यातील चिचोली गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

राजू वांशकर असं आरोपीचं नाव आहे. गुरूवारी पहाटे आरोपीचा पत्नीसोबत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात पतीने कुऱ्हाड घेतली. त्यानंतर झोपलेल्या बायकोच्या एका हाताचा अंगठा आणि दुसऱ्या हाताची दोन बोटं तोडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू होते, असंही पोलिसांनी सांगितलं. महिलेला जखमी अवस्थेत भोपाळमधील हमिदीया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर स्थानिक पोलिसांनी पतीला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मध्य प्रदेशात अशीच एक दुसरी घटना घडली आहे. सागर जिल्ह्यातील पतीने पत्नीचा हातच कापल्याचा प्रकार समोर आला आहे.

पतीने पत्नीचा हात कापला आणि त्यानंतर तिला जंगलातच सोडून दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गंभीर दखल घेतली आहे. “मध्य प्रदेशात मागील १५ दिवसात तीन अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे मला धक्का बसला आहे. तीन भगिणींचे पतींनीच हात कापल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. दुसरा कुणी हल्ला केला, तर गुन्हा आहे. पण पतीचं जर हाथ तोडत असेल, विश्वासघात आहे,” असंही चौहान यांनी म्हटलं आहे.