घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याचदिवशी पतीने पत्नीला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. उत्तर प्रदेशच्या फेतहगंजमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. “मला ट्रेनमधून बाहेर फेकल्यानंतर नवऱ्याने सुद्धा धावत्या ट्रेनमधून उडी मारली” असे बेबीने (१८) पोलिसांना सांगितले. फतेहगंज (पश्चिम) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे रुळावर बेबी आणि हिरा दोघेही पती-पत्नी बेशुद्ध अवस्थेत सापडले. दोघांनाही लगेच जिल्हा रुग्णालयाच्या आपातकालीन कक्षात दाखल करण्यात आले.

हिराने आपल्याला धावत्या ट्रेनमधून फेकून दिले नंतर स्वत:ही बाहेर उडी मारली असा आरोप बेबीने केला आहे. बेबी आसामच्या तीनसुकियामध्ये राहते. “मागच्या तीन महिन्यांपासून मला एका अज्ञात नंबरवरुन फोन येत होता. हिराच तो फोन करायचा. मी त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली व त्याच्या प्रेमात पडली. आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २६ जुलैल हिरा तीनसुकियामध्ये आला होता. त्यावेळी मी त्याच्यासोबत पळून गेले. आम्ही दोघे पाटण्याला आलो. तिथे दोन दिवस एका हॉटेलमध्ये राहिल्यानंतर २९ जुलैला मंदिरात लग्न केले” असे बेबीने सांगितले.

मंगळवारी मोरादाबाद येथे जाणारी ट्रेन आम्ही पकडली. ट्रेनने बरेली सोडल्यानंतर हिराने मला ट्रेन बाहेर फेकून दिले असे बेबी म्हणाली. हिरा काही बोलण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे तो असा का वागला? त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? ते समजू शकलेले नाही. रेल्वे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी दिली.