पत्नीला तिहेरी तलाक दिल्या प्रकरणी मध्य प्रदेशच्या झांबुआ जिल्ह्यातील मेघनगरमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पत्नीचा लठ्ठपणा या तिहेरी तलाकसाठी कारण ठरला आहे. आपण लठ्ठ आहोत म्हणून पतीने आपल्याला तिहेरी तलाक दिला असा दावा संबंधित महिलेने केला आहे. सलमा बानो असे पीडित महिलेचे नाव आहे.

लठ्ठ असल्यामुळे पतीकडून नेहमीच मला वाईट वागणूक मिळायची. मेघनगरच्या घरी आल्यानंतर नवरा अनेकदा मला बेदम मारहाण करायचा. त्याने तलाक दिल्यानंतर मी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असे सलमा बानो यांनी सांगितले.

१० वर्षांपूर्वी सलमा आणि अरिदचे लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुले आहेत. सलमाच्या तक्रारीनंतर अरिफला कलम ३२३ आणि कलम ४९८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे असे मेघनगर पोलीस स्टेशनचे प्रमुख कुशल सिंह रावत यांनी सांगितले. नवरा आणि सासू लठ्ठपणावरुन नेहमीच आपल्याला टोमणे मारायचे असे सलमाने सांगितले. तिहेरी तलाक दिल्यानंतर नवऱ्याने मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली असे बानोने सांगितले.