ब्रेकअप झालं किंवा पत्नीशी भांडण झाल्याने वाद झाल्याच्या अनेक बातम्या वाचनात येतात. मात्र उत्तर प्रदेशमधील मऊ येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे प्रेमविवाहमुळे कंटाळलेल्या एका माथेफिरु तरुणाने चक्क रेल्वेचे रुळ कापले आहेत. मऊ जिल्ह्यातील रतनपुरा रेल्वे स्थानकाजवळ रुळ कापल्याचे वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार हलधरपूर रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या रतनपुरा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या खांबाजवळ एका माथेफिरुने रुळ कापल्याचे दिसून आले. हे रुळ दोन इंचांपर्यंत कापण्यात आले होते. या कापलेल्या रुळांजवळ माथेफिरुने ठेवलेल्या चिठ्ठीमधून हा प्रकार प्रेमविवाहाला कंटाळत असल्यामुळे करत असल्याचं म्हटलं आहे. ‘आपण प्रेमविवाह करुन घरी आणलेल्या पत्नीला तिच्या माहेरी नेऊन सोडावे. तसेच मला ५० कोटी रुपये द्यावेत,’ अशा विचित्र मागण्या या चिठ्ठीमध्ये माथेफिरुने केली आहे. इतकचं नाही तर ‘या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण यापेक्षा मोठा अपघात घडवून आणू’ असंही या माथेफिरुने चिठ्ठीमध्ये नमूद केलं आहे.

रुळ कापल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर रेल्वे मार्गाजवळ बघ्यांची गर्दी झाली. त्यावेळी एका व्यक्तीला तेथे एक चिठ्ठी दिसली. याबद्दलची माहिती त्याने स्टेशन मास्तरला दिली. वेळीच माहिती मिळाल्यामुळे स्टेशन मास्तरने घटनास्थळापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेली बलिया-शाहगंज पॅसेंजर ट्रेन थांबवली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणामध्ये रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहचलव्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या चिठ्ठीच्या माध्यमातून अक्षरतज्ज्ञांच्या मदतीने तपास करत असल्याचे समजते.