पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर पतीने २५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. रविवारी शेतात मृतदेह सापडल्यानंतर हत्येचा हा गुन्हा उघडकीस आला. महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली. पोलीस चौकशीमध्ये पतीने हत्येच्या गुन्ह्याची कबुली दिली. शरीरसंबंध ठेवल्यानंतर ओढणीने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. अमित लाल असे आरोपी पतीचे नाव आहे. तो कानपूर देहात जिल्ह्यातील नासीरपूर गावचा राहणारा आहे. पत्नी कांचन हमीरपूरला तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून, त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. अमित आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी सतत कांचनचा छळ करायचे. त्यामुळे सततच्या या भांडणाला कंटाळून ती चार जानेवारीला हमीरपूरला तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली. दोन फेब्रुवारीपासून कांचन बेपत्ता होती. तीन फेब्रुवारीला कांचनच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांशी बोलताना, जावयावर संशय व्यक्त केला होता. आणखी वाचा- स्टेजवर फक्त नवरीचेच फोटो काढत होता फोटोग्राफर, रागाच्या भरात नवऱ्याने मारली जोरदार… Viral Video हत्येच्या आधी काय घडलं? पोलिसांनी अमित लालला ताब्यात घेऊन आपल्या पद्धतीने चौकशी सुरु केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. "अमितने पैसे देण्याच्या बहाण्याने कांचनला हमीरपूरमध्येच बाहेर भेटायला बोलावले. कांचन भेटल्यानंतर तो तिला गोडीगुलाबीने जवळच्या शेतात घेऊन गेला, तिथे त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर कांचनच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केली. तिचा मृतदेह कोणाच्या नजरेस पडणार नाही, अशी पद्धतीने शेतामध्ये लपवला. त्यानंतर तिचा मोबाइल फोन नदीत फेकून दिला" असे सर्कल अधिकारी अनुराग सिंह यांनी सांगितले. का केली हत्या? "मला कांचनसोबत संसार करायचा होता. पण माझ्या घरी नांदण्यास कांचन आणि तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे मी पत्नीच्या हत्येचे कारस्थान रचले" असे आरोपी अमित लालने पोलिसांना सांगितले.