छत्तीसगडमध्ये एका तरुणाने तंत्र-मंत्र आणि अंधश्रद्धेमुळे आपल्या आईसहीत इतर तीन जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरगुजा जिल्ह्यामध्ये शनिवारी (४ एप्रिल रोजी) हे भयानक हत्याकांड घडलं. या प्रकरणात ईश्वर नावाच्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अंधश्रद्धेमुळे ईश्वरने चार व्यक्तींबरोबरच एक डझनहून अधिक प्राण्यांचीही हत्या केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरगुजा जिल्ह्यातील सीतापुर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील देवगडमधील सरनापारा गावामध्ये राहणाऱ्या ईश्वरने चार जणांची हत्या केली. तंत्र साधना आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या मोहने ईश्वरने आपल्या आईसहीत इतर तीन जणांची हत्या केल्याचे सांगितलं जात आहे. ईश्वर इतक्यावर थांबला नाही त्याने या चार जणांची हत्या केल्यानंतर तीन बैल आणि १२ कोंबड्याही कापल्याचा आरोप आहे.

सरनापारा गावातील या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांचा मोठा ताफा गावात दाखल झाला. पोलिसांनी ईश्वरला अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गावकऱ्यांकडे चौकशी केली. चारही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. ईश्वरच्या नातेवाईकांचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

ईश्वरने अंधश्रद्धेमुळे या हत्या केल्याची गावामध्ये चर्चा आहे. पोलिसांनी अद्याप ईश्वरला मानसिक तपासणीसाठी नेलेलं नाही. त्यामुळे त्याने मनोरुग्ण आहे की त्याने मुद्दा या हत्या केल्या हे तपासामध्ये उघड होईल. प्राथमिक माहितीनुसार हे प्रकरण अंधश्रद्धा, सिद्धी प्राप्त करणे आणि तंत्र-मंत्राशी संबंधित असल्याचा संक्षय व्यक्त केला जात आहे. ईश्वरबरोबर इतर काही जण या हत्याकांडामध्ये सहभागी होते असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा आता सर्व बाजूने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दोनच महिन्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये इटावामध्येही अशीच एक घटना समोर आली होती. येथील काही लोकांनी भूत-प्रेत उतरवण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीची हत्या केली होती. एका महिलेवर उपचार करण्यासाठी एक तरुण या हरगोविंद नावाच्या या व्यक्तीकडे गेला होता. मात्र या महिलेच्या कुटुंबियांचा आणि हरगोविंदचा वाद झाल्यानंतर या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींनी हरगोविंदची हत्या केली होती.