चेन्नईजवळील मिंजूर येथे एका दांपत्याची पहिली रात्रच काळरात्र ठरली. नवविवाहित तरुणाने लग्नाच्या पहिल्या रात्रीच आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार तरुणाचे नाव नितीवासन असे असून तो २४ वर्षांचा होता. तर त्याच्या पत्नीचे नाव संध्या असे होते. २० वर्षीय संध्या ही तरुणाची दूरची नातेवाई होती. बुधवारी यांचं लग्न झालं होतं.

करोनामुळे सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अगदी २० लोकांच्या उपस्थितीमध्ये नितीवासन आणि संध्या लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नाच्या रात्रीच घरातील नातेवाईकांना या दोघांच्या रुममधून आवाज आला. नातेवाईकांनी या दोघांच्या खोलीकडे धाव घेतली आणि दरवाजा उघडून आतमध्ये गेले. त्यावेळी त्यांना संध्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. तिच्या बाजूला रक्त लागलेला एक लोखंडी दांडाही पडलेला होता. खोलीमध्ये नितीवासन नसल्याचेही नातेवाईकांच्या लक्षात आलं. यासंदर्भातील वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी नितीवासनचा शोध सुरु केला. जवळच्याच परिसरामध्ये एका झाडाला नितीवासनचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. नितीवासनने पत्नीची हत्या करुन आत्महत्या का केली यामागील गूढ अद्याप उलगलेलं नाही. या प्रकरणामध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवदांपत्याचा अशाप्रकारे अंत झाल्याने घरच्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.