एअर इंडियाने भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा आणि ६ इतर खेळाडुंना विमानात जागा नसल्याचे कारण सांगत विमानात प्रवेश दिला नाही. टेबल टेनिसच्या या खेळाडुंना रविवारी मेलबर्नला रवाना व्हायचे होते. भारतीय संघाच्या या पथकात १७ खेळाडुंचा समावेश होता. हे सर्व खेळाडु आयटीटीएफ वर्ल्ड टूर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी जाणार होते. ही स्पर्धा सोमवारपासून सुरू होणार आहे. पण एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये एकूण १७ खेळाडुंपैकी फक्त १० खेळाडुंनाच जाता आले. उर्वरित खेळाडुंना एअर इंडियाने विमानतळावरील काऊंटरवर शेड्यूल फ्लाइट ओव्हरबुक्ड असल्यामुळे पुढे जाता येणार नसल्याचे कारण सांगत त्यांना तिथेच रोखले.

मनिकाबरोबर शरथ कमल, मौमा दास, मधुरिका पाटकर, हरमीत देसाई, सुथिर्ता मुखर्जी, साथयां गणासेकरण यांना एअर इंडियाने प्रवेश नाकारला. राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मनिका बत्राने हा वाईट अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये तिने क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि पंतप्रधान कार्यालयालाही टॅग करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आपल्या ट्विटमध्ये मनिकाने म्हटले आहे की, भारतीय टेबल टेनिस टीमचे खेळाडु आणि अधिकाऱ्यांचे १७ सदस्यांचे पथक आहे. यामध्ये राष्ट्रकूल स्पर्धेचे पदक विजेती मी स्वत: शरथ कमल, मौमा दास, मधुरिका, हरमीत, सुथिर्ता, साथयां यांना आज मेलबर्नला AI 0308 मध्ये आयटीटीएफ वर्ल्ड टूरला जायचे होते.

मनिकाने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा आम्ही एअर इंडियाच्या काऊंटरवर पोहोचलो. तेव्हा आम्हाला सांगितले की फ्लाइट ओव्हरबुक्ड आहे आणि या फ्लाइटमध्ये फक्त १० खेळाडुच नेता येऊ शकतील. एअर इंडियाच्या या गैरव्यवस्थापनामुळे आम्हा ७ खेळाडुंना धक्का बसला आहे. आमची सर्व तिकिटे बालमेर लॉरीद्वारे बुक करण्यात आली होती.

दरम्यान, खेल भारतच्या महासंचालक नीलम कपूर यांनी मनिकांच्या या ट्विटला लगेच उत्तर देत या प्रकरणी आम्ही त्वरीत लक्ष घालत असल्याचे सांगितले.