देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला. माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सचिन पायलट हे देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण ती फक्त अफवाच ठरल्यानंतर आता काँग्रेसला दुसरा मोठा झटका बसला आहे. अवघ्या ५ दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या दिल्लीमधील पक्षकार्यालयात गोविंददास यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गोविंददास यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांनी रविवारी सकाळीच भाजपामध्ये एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यानुसार दुपारा १२ वाजता गोविंददास यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. यावेळी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह हे देखील उपस्थित होते. "पुढील वर्षी मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मी या निवडणुकांमध्ये भाजपासाठी पूर्ण क्षमतेनं काम करेन", अशी प्रतिक्रिया गोविंददास यांनी पक्षप्रवेशानंतर दिली. Delhi | Govindas Konthoujam, former Manipur Congress chief joins Bharatiya Janata Party, in the presence of Manipur CM N Biren Singh pic.twitter.com/U8tffLfc10 — ANI (@ANI) August 1, 2021 वैयक्तिक कारण सांगून दिला राजीनामा, पाचच दिवसांत केला भाजपा प्रवेश! गोविंददास हे मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून बराच काळ कार्यरत होते. मात्र, वैयक्तिक कारणं पुढे करून त्यांनी पाचच दिवसांपूर्वी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. याशिवाय, त्यांनी मणिपूर विधानसभा आमदारकीचा देखील राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्यामागे वैयक्तिक नसून अंतर्गत राजकीय कारणे असावीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. Next year state elections are due in Manipur, and I will work dedicatedly for Bharatiya Janata Party in those elections: Govindas Konthoujam, on joining BJP in Delhi pic.twitter.com/VMpZmKj1a5 — ANI (@ANI) August 1, 2021 पूर्वेकडच्या राज्यांमधलं मोठं नाव गोविंददास हे पूर्वेकडील राज्यांमधले आणि विशेषत: मणिपूरमधले महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्या विष्णुपूर मतदारसंघातून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. मणिपूर विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ५६ आहे. यापैकी भाजपाकडे २५ जागा असून काँग्रेसकडे १७ जागा होत्या. मात्र, आता गोविंददास यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचं संख्याबळ १६वर आलं आहे.