टूजी स्पेक्ट्रम, कोळसा खाणवाटप आणि राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा या तीन घोटाळ्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वेळीच योग्य निर्णय घेतले असते, तर सर्वकाही टाळता आले असते मात्र, सिंग यांच्याकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे खुद्द मनमोहन सिंग या घोटाळ्यांसाठी तत्वत: जबाबदार नसले तरी, पंतप्रधान म्हणून अंतिमत: जबाबदारी त्यांचीच असल्याची टीका माजी महालेखापरिक्षक(कॅग) विनोद राय यांनी केली आहे.
राय यांच्या येऊ घातलेल्या ‘नॉट जस्ट अॅन अकाऊंट, द डायरी ऑफ नेशन्स कन्सन्स’ या पुस्तकात देशातील तीन प्रमुख घोटाळ्यांचे केंद्रस्थान म्हणून मनमोहन सिंग देखील जबाबदारी पातळीवर कारणीभूत असल्याचे नमूद करत राय यांनी सिंग यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.
स्पेक्ट्रम वाटपासंदर्भातील निर्णयांची माहिती तत्कालीन दूरसंचार मंत्री ए.राजा यांनी वेळोवेळी सिंग यांना पत्राद्वारे दिली होती. मात्र, त्यांनी याबाबत निष्क्रीयता बाळगली असल्याचे राय म्हणाले. तसेच टूजी आणि कोळसा खाणवाटप प्रक्रीयेत घोळ होत असल्याची ताकीद मिळाल्यानंतर सिंग यांनी ही वाटपप्रक्रिया थांबवून वेळीच मंत्रिमंडळाकडे पुर्नविचारासाठी पाठवली असती, तर हे महाभारत घडलेच नसते असेही राय म्हणाले आहेत.