मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यामध्ये झालेल्या एका विचित्र अपघातामध्ये एकाच वेळी १५ जण एका विहिरीत पडल्याची अजब घटना समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर खुद्द मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीच यात लक्ष घातलं आणि स्थानिक प्रशासनासोबतच विदिशाचे पालकमंत्री विश्वास सारंग यांना देखील तातडीने घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आपण स्वत: सर्व माहिती वेळोवेळी घेत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. मात्र, हा अपघात ज्या पद्धतीने घडला, त्यावर सगळ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नेमकं झालं काय?

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. विदिशा जिल्ह्याच्या गंजबासौदा भागातल्या लाल पठार परिसरात हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या एका विहिरीमध्ये पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. मात्र, त्यापाठोपाठ त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आणि ते ‘बचावकार्य’ बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं या विहिरीभोवती गर्दी झाली. प्रशासन तिथे पोहोचेपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती.

बघ्यांची गर्दी आणि ‘बचावकार्य’!

दरम्यान, विहिरीच्या भोवती गर्दी एवढी वाढली की तिथेच चेंगराचेंगरी होण्याची परिस्थिती निर्माण झाली. विहिरीभोवती बांधण्यात आलेल्या कठड्यावरून वाकून वाकून सर्व लोक विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न बघत होते. मात्र, हा भार विहिरीच्या कठड्याला पेलवला नाही आणि अचानक कठडा धसला. कठडाच मोडून पडल्यानंतर त्याला रेलून उभे असलेले किमान १५ जण एकाच वेळी विहिरीत पडले. या घटनेची माहिती मिळताच बचावपथकाला घटनास्थळी रवाना करण्यात आलं.

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने डीजीपी, एसडीआरएप, आयजी यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. तसेच, आपण स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेऊन आहोत, असं देखील चौहान यांनी स्पष्ट केलं आहे. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींचा सामना बचाव पथकाला करावा लागत आहे.