भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)ने आत्मसमर्पीत माओवादी नेता सुचित्रा महातो हीला किशनजीच्या मृत्यूला जबाबदार धरले आहे.  माओवाद्यांच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य किशनजीचा नोव्हेबर २०११ मध्ये जंगल महाल, पश्चिम बंगालमध्ये पोलिसांसोबत झालेल्या एका चकमकीत मृत्यू झाला होता. माओवाद्यांनी त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण आहेत ते जाणून घेण्यासाठी ‘पक्षांतर्गत चौकशी समिती’ नेमली होती.
किशनजीच्या शेवटच्या दिवसांमध्ये सुचित्रा त्याच्या सोबत होती. पोलिसांसोबत कटरचून किशनजीला जाळ्यात अडकविण्यात तिचा सहभाग आहे. तिने चळवळी सोबत ‘गद्दारी’ केली असून, वेळ आल्यावर सुचित्राला तिच्या गद्दारीची शिक्षा देण्यात येईल. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कटातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असून, त्यांना देखील सोडण्यात येणार नसल्याचे भाकप(माओवादी)ने सांगितले आहे.
“किशनजीच्या मृत्यू पूर्वी एक महिना पक्षाच्या केंद्रीय समितीसोबत त्याचा संपर्क तुटला होता. तो पश्चिम बंगाल सरकारच्या काही नेत्यांच्या संपर्कात होता व शस्त्रसंधी संदर्भात तडजोड सुरू होती. काही वरिष्ठ माओवादी नेत्यांना हाताशी धरत प. बंगाल सरकारने त्याला जाळ्यात अडकवून सुरक्षायंत्रणे करवी चकमकीत मारले.”, असे वरिष्ठ माओवादी सूत्रांनी ‘द संडे एक्सप्रेस’ला सांगितले.