कैदेतून मुक्तता करताच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी कलम ३७० परत मिळवण्याची काश्मिरी जनतेला हाक दिली आहे. मेहबुबा मुफ्ती यांना मंगळवारी सोडण्यात आलं. तब्बल १४ महिन्यांपासून त्यांना कैद करण्यात आलं होतं. कैदेतून मुक्तता झाल्यानंतर ३७० कलमावरून मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “दिल्लीनं जे हिसकावून घेतलं आहे, ते परत मिळवायचं आहे,” असा इशारा मुफ्ती यांनी मोदी सरकारला दिला आहे.

केंद्र सरकारनं जम्मू काश्मिरला विशेष दर्जा देण्याचं कलम रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जम्मू व काश्मिरातील अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. माजी मेहबुबा मुफ्ती यांनाही प्रशासनानं ताब्यात घेत नजरकैदेत ठेवलं होतं. अखेर मंगळवारी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्या मुलीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ही जम्मू काश्मीर प्रशासनानं त्यांना मुक्त केलं.

कैदेतून मुक्तता झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यात पूर्ण अंधार असून, मेहबुबा मुफ्ती यांनी संवाद साधला आहे. “एक वर्षापेक्षा अधिक काळ कैदेत राहिल्यानंतर मला सोडण्यात आलं आहे. ५ ऑगस्ट २०१९ या काळ्या दिवशी घेण्यात आलेला निर्णय माझ्या ह्रदयावर घाव घालत राहिला. मला विश्वास आहे की, अशीच परिस्थिती जम्मू काश्मीरमधील लोकांची असेल. या सरकारनं लोकांचा जो अपमान केला आहे, जनता तो विसरणार नाही. आता आपल्याला निर्धार करावा लागेल की, ५ ऑगस्ट रोजी दिल्लीनं बेकायदेशीरपणे जे हिसकावून घेतलं, ते परत घ्यावं लागेल,” असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या.

“कलम ३७० हटवणे एक बेकायदेशीर निर्णय होता. पण जम्मू काश्मिरातील जनता हा निर्णय बदलण्यासाठी एकजुटीनं लढतील आणि हजारोंचे जीव घेणारे मुद्दे निकाली काढण्यासाठी सोबत मिळून काम करतील. हा संघर्ष सोपा असणार नाही. मला सोडण्याबरोबरच जम्मू काश्मिरातील तुरूंगामध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना तातडीनं मुक्त करण्यात यावं,” असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं.