संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस होता. दरम्यान आज दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ झाल्याचे दिसून आले. लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोठ्याप्रमाणावर गोंधळ घालत संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आले.

प्रचंड गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज १२.३० वाजेपर्यंत स्थगितही करण्यात आले होते. दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी कागदपत्र फाडून फेकाफेक करत, घोषणाबाजी देखील केली. तसेच, खेला होबे असे देखील नारे देण्यात आले.

पेगॅसस, करोना आदी मुद्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तर, काँग्रेससह १४ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारला घेरण्याची व दबाव निर्माण करण्याची रणनिती आखली आहे.

पेगॅसस हेरगिरी प्रकरणानरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचे नेते पंतप्रधान व गृहमंत्र्यांना जाब विचारत आहे. तर, सरकारचे म्हणणे आहे की विरोधकांची सभागृहाचे कामकाज चालू देण्याची किंवा चर्चा करण्याची इच्छा नाही. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींनी सांगितले की, पेगॅसस हेरगिरी प्रकरणी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, याप्रकरणी १४ पक्षांकडून नोटीस दिली जाईल.

तर, दुसरीकडे पंतप्रधानांच्या कोअर ग्रुपची बैठकी देखील झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, पीयूष गोयल यांची उपस्थिती होती. यावर संसदेतील रणनिती काय असणार याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

संसदेत ‘पेगॅसस कोंडी’ कायम

केंद्र सरकारचा अनौपचारिक स्तरावर विरोधी पक्षांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे काल (मंगळवार) देखील ‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तहकुबी नाटय़ रंगले होते. ‘पेगॅसस’ प्रकरणावर संसदेत केंद्र सरकारने चर्चा करावी तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी विरोधकांनी एकत्रित मागणी केली होती. अन्यथा संसदेचे कामकाज होऊ  दिले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी दिले होते.