गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमा संघर्षानं तोंड वर काढलं आहे. चीनकडून सातत्यानं सीमेवर आगळीक केली जात असून, घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले असले, तरी सीमेवरील तणाव कायम असून, दोन्ही देशांमध्ये पुढील आठवड्यात लष्करी पातळीवरील चर्चा होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चर्चेची ही सातवी फेरी पार पडणार आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन सीमावाद प्रकर्षानं समोर आला. त्यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे. गलवानमध्ये २० जवान शहीद झाल्यानं भारतानं संताप व्यक्त केला होता. तसेच चीनच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, चीनकडून गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचेही प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सीमेवरील तणाव कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मागील महिन्यात चिनी सैन्यानं पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या पूर्व भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्तक असलेल्या भारतीय लष्करानं हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पुन्हा सीमेवर तणाव वाढला. दरम्यान, गलवान संघर्षानंतर यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशात लष्करी चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या सहा फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, सातवी फेरी पूर्व लडाखमध्ये १२ ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशातील आमनेसामने आलेलं सैन्य मागे घेण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. India and China to hold Corps Commander-level talks on October 12 in Eastern Ladakh sector to address the ongoing military standoff between the two countries. So far, The two sides have held six rounds of Corps Commander-level talks: Indian Army Sources — ANI (@ANI) October 4, 2020 गलवान खोऱ्यातील १५ जूनच्या संघर्षांत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील तणाव वाढला. त्यानंतर पेंगाँग सरोवर परिसरात किमान तीनदा चिनी सैन्याने भारतीय जवानांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्यक्ष ताबारेषेवर गेल्या ४५ वर्षांत पहिल्यांदाच गोळीबारही झाला. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरही तिढा कायम आहे.