शुक्रवारी ISRO ने अंतराळात पाठवलेल्या सॅटेलाईट्समुळे सैन्यदलाची ताकद वाढली आहे. ‘आय इन द स्काय’ या नावाने धाडण्यात आलेले हे सॅटेलाईट्स भारतीय सैन्यदलाचे बळ वाढले आहे. भारताच्या सॅटलेलाईट्सची संख्या आता १३ झाली आहे. सीमेवर आणि सीमा भागांवर करडी नजर ठेवण्यासाठी या सॅटेलाईट्सचा उपयोग होणार आहे. तसेच शत्रूवरही करडी नजर ठेवली जाणार आहे. शत्रू जमिनीच्या मार्गावरून येत असो किंवा समुद्राच्या मार्गाने, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी या उपग्रहांचा फायदा भारताला होणार आहे.

या उपग्रहांपैकी काही उपग्रह हे पृथ्वीच्या कक्षेत आहेत. पृथ्वीपासून २००१,२०२ किलोमीटर उंच अंतरावर हे उपग्रह आहेत. त्यामुळे पृथ्वीचे स्कॅनिंग करण्यास मोठा हातभार लागणार आहे. काही उपग्रह जिओ ऑर्बिटमध्येही ठेवण्यात आले आहेत.

शुक्रवारीच आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटामधून पीएसएलव्ही सी ३८ या यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या माध्यमातून इस्त्रोने कार्टोसेट-२ या मालिकेतील उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीवरच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे इस्त्रोने या मोहिमेच्या वेळीच स्पष्ट केले होते. आता भारतीय सैन्यदलाची ताकद वाढवण्यात या उपग्रहांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. कार्टोसेट-२ मालिकेतील उपग्रहासोबतच आणखी ३० लहान उपग्रहांसह पीएसएलव्हीने श्रीहरिकोटामधून यशस्वी उड्डाण केले.

युद्धनौकांमध्ये वेळेची अचूकता साधण्यासाठी जी सॅट-७ चा वापर भारतीय नौदलाकडून होतो. लवकरच भारत अँटी सॅटेलाईट वेपनही तयार करणार आहे. याचा वापर शत्रूचे उपग्रह नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. सध्याच्या घडीला भारताच्या १३ उपग्रहांनी मात्र सैन्यदलांची ताकद वाढवली आहे यात काहीही शंका नाही.