बिहारमध्ये एकापाठोपाठ एक जमावाद्वारे हत्या केल्याचे प्रकार समोर येत आहेत. बेगुसराय येथील घटना ताजी असतानाच आता नवादा येथील हिसुआ ठाणे क्षेत्रातील ग्रामस्थांनी चोरीच्या संशयावरून केलेल्या बेदम मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री लवरपुरा गावातील संजय राजवंशी यांच्या घरात चार जण चोरी करण्यासाठी घुसले होते. त्याची चाहूल लागताच घरातील महिला जाग्या झाल्या आणि त्यांनी आरडोओरड करण्यास सुरूवात केली.

महिलांचा आवाज ऐकून गावातील लोक एकत्र आले. ग्रामस्थांना पाहून सर्व चोर पळून जाऊ लागले. पळणाऱ्यापैकी एक जण ग्रामस्थांच्या हाती लागला. ग्रामस्थांनी त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना समजताच पोलीस गावात आले आणि जखमी व्यक्तीला रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत व्यक्ती हा नरहट ठाणे क्षेत्रातील चातर गावचा रहिवासी रुपन मांझी असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी बेगुसराय जिल्ह्यात एका मुलीचे अपहरण करण्यासाठी आलेल्या तिघांचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.