केंद्रीय संरक्षण राजनाथ सिंह यांनी आज मोठा निर्णय घेत संरक्षण खातं हे आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. १०१ उत्पादनांची यादी तयार करण्यात आली असून या उत्पादनांच्या आयातीला स्थगिती देण्याचा निर्णय राजनाथ सिंह यांनी घेतला आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह हे महत्त्वाची घोषणा करणार आहेत हे आधीच स्पष्ट करण्यात आलं होतं. भारताच्या संरक्षण खात्याला मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी संधी मिळेल असं जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

संरक्षणासाठी लागणारी उत्पादनं ही भारतातील असावीत असा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. खासगी आणि पब्लिक सेक्टरशी चर्चा करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. आत्तापर्यंत २६० योजनांसाठी भारताच्या तिन्ही दलांनी एप्रिल २०१५ ते ऑगस्ट २०२० या कालवाधीत साडेतीन लाख कोटींची कंत्राटं दिली होती. मात्र आता हीच कंत्राटं देशात मिळाली तर पुढील सहा ते सात वर्षात भारतातील उत्पादकांना ४ लाख कोटींची कंत्राटं दिली जातील असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

गलवानमध्ये झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यामुळे चीन आणि भारत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. अशात आता राजनाथ सिंह यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. सगळ्या स्टेक होल्डर्सशी चर्चा केल्यानंतर उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येईल. २०२० ते २०२४ या कालावधीत हे निर्णय लागू करण्यात येतील. १०१ उत्पादनांच्या यादीत AFVs चा समावेश आहे. यासाठी ५२ हजार कोटींचं बजेट तयार करण्यात आलं आहे.