केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला कायमच प्राधान्य दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये आले होते. देशभरातील रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण सरकारच्या अजेंड्यावर असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 'रेल्वेच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. रेल्वे देशाच्या प्रगतीला गती देते. त्यामुळे रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे. याशिवाय बायो टॉयलेटच्या कामांनादेखील गती दिली जात आहे. रेल्वेला अधिकाधिक निधी दिली जातो आहे. कामाचा वेग वाढवण्यासोबतच कामाचा दर्जादेखील जपला जातो आहे. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावतो आहे. भारतीय रेल्वेचा बदलाच्या दिशेने प्रवास सुरू आहे,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजनाच्या कार्यक्रमात म्हटले आहे. 'आधीच्या सरकारांमध्ये रेल्वे मंत्रालय नेहमीच मित्रपक्षांना देण्यात आले. रेल्वे मंत्रालयाचे हे कटू वास्तव आहे. रेल्वे हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. देशातील गरिबातील गरिब व्यक्तीला रेल्वेमुळे लाभ मिळायला हवा. रेल्वेची प्रगती व्हावी आणि देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर आणखी उंचवावा, असे आम्हाला वाटते,' असे मोदी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमीपूजन केले. गांधीनगर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाठी २५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे गांधीनगर रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार आहे. 'विमानतळासारख्या अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले गांधीनगर हे देशाचे पहिले रेल्वे स्थानक असेल,' असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. गांधीनगर रेल्वे स्थानकावर पंचतारांकित हॉटेल उभारण्यात येणार आहे. हे पंचतारांकित हॉटेल या रेल्वे स्थानकाचे वैशिष्ट्य असणार आहे. या हॉटेलमध्ये ३०० खोल्या असणार आहेत. गुजरातमधील विविध कामांसाठी, परिषदांसाठी येणाऱ्या शिष्टमंडळांच्या राहण्याची सुविधा म्हणून या हॉटेलची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयी सुविधेतही या हॉटेलमुळे भर पडणार आहे.