पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि  तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे. सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “लवकरच AAI म्हणजे ‘एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ऐवजी ‘अदानी एअरपोर्ट्स ऑफ इंडिया’ म्हणून ओळखलं जाईल”

लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या देखभालीचे हक्क २०१९ साली खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी उद्योग समुहाला देण्यात आले होते. याच निर्णयाची अंमलबाजवणी करण्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले असून जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममधील विमानतळाचे हक्क अदानी समुहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहापैकी लखनौ, अहमदाबाद आणि मंगळूरू विमानतळाचे हक्क अद्याप भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे असून लवकरच तेही अदानी कंपनीला देण्यात येणार आहेत. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात  भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या विमानांचे खासगीकरण केल्याने फायदा होणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये अदानी समूहाने देशाच्या नागरी हवाई सेवाक्षेत्रात शिरकाव करताना  सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले.  स्पर्धकांच्या तुलनेत अधिक रकमेची बोली लावूनही अदानी समूहाला हे कंत्राट मिळाले.  समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुअनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांच्या परिचलनाचे कंत्राट मिळविले असून त्यासाठी प्रति प्रवासी अनुक्रमे १७७, १७४, १७१, १६८ आणि ११५ रुपये भाडे निश्चित केले. या करारामुळे पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असणार आहे. अदानीच्या स्पर्धेत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचे परिचलन करणाऱ्या जीएमआरची निविदा कमी रकमेची असूनही अदानीची निवड झाली. गुवाहाटी विमानतळ वगळता यादीतील इतर पाच विमानतळांकरिता १० कंपन्यांच्या ३२ तांत्रिक निविदा आल्या होत्या. पैकी कंत्राटविजेत्या अदानीचा आता या क्षेत्रातही शिरकाव झाला आहे. समूह सध्या बंदर, जहाज, ऊर्जा तसेच अन्य पायाभूत क्षेत्रात कार्यरत आहे.

मुंबई विमानतळामध्येही गुंतवणूकीसाठी उत्सुक

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सहा विमातळांचे कंत्राट मिळवल्यानंतर समोर आलं होतं. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठीही अदानी समूहाने १० हजार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती समोर आली होती. १८ हजार कोटींपैकी १० हजार कोटी मुंबई विमानतळासाठी तर उर्वरित आठ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार असल्याचे वृत्त बिझनेस स्टॅण्डर्सने दिलं होतं.