राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातक मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. पवार म्हणाले, "कृषी बिलं सिलेक्ट कमिटीकडे न पाठवता गोंधळात सभागृह मंजूर करण्यात आली तेव्हाच मला वाटत होतं की हे बिघडू शकतं कुठेतरी शेतकरी वर्गाकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. गेल्या ५० ते ६० दिवस पंजाब भागातील शेतकऱ्यांनी या कायद्यांसंबंधी भूमिका घेतली आणि अत्यंत शांततेत त्यांनी आंदोलन केलं. इतका काळ संयम दाखवणं ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमानं भूमिका घेत असताना केंद्रानं यावर संयमानं भूमिका घ्यायची होती. मात्र, सरकारला आपला स्टँड सोडायचाच नाही त्यामुळे सर्व चर्चा अपयशी झाल्या." आणखी वाचा- शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा हिंसाचार : १५ गुन्हे दाखल, ८६ पोलीस जखमी इतके दिवस शांततेत आंदोलन करुनही तोडगा निघत नसल्याने यासंदर्भात मोठं आंदोलन करावं यासाठी त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. शांततेत आंदोलन करणारे हे लोक रस्त्यावर उतरणार होते म्हणून केंद्रानं त्यांच्याकडे समंजसपणानं बघण्याची गरज होती. मात्र, तसं घडलेलं नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात येणं आणि जाणं याबाबत जाचक अटी लादल्या गेल्या. त्याला प्रतिकार झाला पण तिरीही सरकारनं ६० दिवसांचा त्यांचा समंजसपणा लक्षात घ्यायला हवा होता. हे वातावरण चिघळलं आहे, पण हे का घडलं याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशी भूमिका यावेळी पवार यांनी मांडली. माझी अपेक्षा अशी आहे की, केंद्रानं अजूनही शहाणपणा दाखवून या घटकांशी बोलत असताना एकदम टोकाची भूमिका सोडावी आणि चर्चा करावी. रास्त मागण्यांवर गांभीर्याने भूमिका घेऊन तोडगा काढायला हवा. पंजाबला पुन्हा अस्वस्थेकडे नेण्याचं पातक मोदी सरकारनं करु नये, अशी माझी इच्छा आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी मोदी सरकारला आवाहन केले.