पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवून मोदी सरकार नफेखोरी करत आहे. असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच एक्साइजचे दर कमी करा आणि इंधनाचे दर नियंत्रणात आणा असंही त्यांनी म्हटलं आहे. आपला एक व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी ही मागणी केली आहे. करोना, बेरोजगारी, आर्थिक संकट यांनी आ वासलेला आहेच. या तीन संकटांमुळे सगळ्याच लोकांना फटका बसला आहे. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, मजूर, शेतकरी या सगळ्यांनाच या तीन गोष्टींमुळे नुकसान झालं आहे. मात्र सर्वाधिक फटका बसला आहे तो मजूर, मध्यमवर्गीय, खासगी नोकरदार, शेतकरी यांना. मोदी सरकारने त्यांचा विचार केला नाही असंही त्यांनी म्हटलंय.

आणखी वाचा- “करोनाच्या संकटात सामान्य माणसाला इंधन दरवाढीचा शॉक नको”

न्याय योजनेची तरतूद करा असं आम्ही केंद्र सरकारला सुचवलं होतं. तसंच आपले लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ठोस तरतूद करा असंही आम्ही सुचवलं होतं. त्यांना एक पॅकेज देण्याची गरज आहे असंही सुचवलं होतं मात्र सरकारने हा सल्ला ऐकला नाही. ठराविक १५ श्रीमंतांना करमाफी देण्यात आली असाही आरोप राहुल गांधींनी केला आहे. लाखो-करोडो रुपये त्यांच्या खिशात सारले असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक, देशभर तीव्र निदर्शने

पेट्रोल डिझेलची दरवाढ सरकारने २२ वेळा केली. हा मोदी सरकारचा आत्तापर्यंत सर्वात वाईट निर्णय होता. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरीब लोकांना थेट फटका बसला असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.