करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला विविध भागांमध्ये मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून उपाययोजनांची माहिती घेत आहेत. शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाले होते. त्यानंतर पंतप्रधानांना भावना अनावर झाल्या. दरम्यान, यावरुन आता मोदींवर टीका करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी करोनामुळे आपली जीव गमावावा लागणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना भावना अनावर झाल्या. “या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं सांगताना नरेंद्र मोदींना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं.

काँग्रेसने यावरुन नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. मोदी राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये नक्की असते अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केली आहे.

“जे लोक साहेबांना गुजरातच्या दिवसांपासून ओळखतात ते सांगतात की, साहेब राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये नक्कीच असते. ते तिथे न गेल्याने चित्रपटांचा फायदा झाला पण, देशाचे नुकसान झालं,” असं खेरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खेरा यांनी शुक्रवारी बैठकीत भावनीक होण्यावरुन ट्वीटच्या माध्यमातून मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी बैठकीत करोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्याला अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागत असल्याचं सांगितलं. “संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असून रुग्णांचा रुग्णालयामधील कालावधीदेखील वाढला आहे,” असं त्यांनी म्हटलं. “लसीकरणामुळे पहिल्या फळीतील योद्ध्यांना संरक्षण मिळालं असून ते लोकांची सेवा करु शकत आहेत. आगामी काळात आपण सर्वांसाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवणार आहोत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी यावेळी काळ्या बुरशीचा उल्लेख करत करोनाच्या लढाईदरम्यान नवं संकट निर्माण झालं असून आपण त्यादृष्टीने पूर्वकाळजी आणि तयारी करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.