काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढविला. मोदी यांनी खोटे बोलणे थांबवावे आणि राज्यातून बेरोजगार युवक स्थलांतर करीत असल्याचे खापर जद (यू) आणि राजदवर फोडणे थांबवावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मोदी येतात आणि मोठी भाषणे करतात; परंतु महाराष्ट्रातील भाजप सरकारकडून बिहारी जनतेला कशी वागणूक मिळते त्याबद्दल त्यांना विचारा. महाराष्ट्रातून बिहारींना हाकलून देण्यात आले तेव्हा त्यांनी काय केले, असे राहुल गांधी म्हणाले. रोजगाराच्या शोधात बिहारमधील युवक स्थलांतर करीत आहेत, त्या प्रश्नावरून मोदी यांनी अलीकडेच आपल्या भाषणांत तोफ डागली होती. बिहारमधील युवकांना राज्य सोडून जाणे कोणी भाग पाडले, असा सवाल मोदी यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांना केला, त्याचा संदर्भ देऊन राहुल गांधी बोलत होते. मोदी हे खोटे बोलत असल्याचे बिहारमधील जनतेलाच नव्हे, तर देशाला कळले आहे. त्यामुळे आता खोटे बोलणे थांबवून मोदी यांनी आपले काम करावे. संघ परिवाराने आपल्याला (मोदींना) प्रशिक्षण दिल्याचे आपल्याला माहीत आहे, असेही गांधी म्हणाले.