जहाल फुटीरतावादी नेता मसरत आलम याची सुटका करण्याच्या जम्मू-काश्मीर सरकारच्या निर्णयाचे जोरदार पडसाद सोमवारी संसदेत उमटले. या मुद्दय़ावरून विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत काश्मिरातील युती सरकारमधून बाहेर पडण्याचे आव्हान भाजपला दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत केंद्राला विश्वासात न घेताच आलमची परस्पर सुटका करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
संसदेच्या कामकाजाला सोमवारी सुरुवात होताच विरोधकांनी आलमच्या मुद्दय़ावरून केंद्र सरकारला धारेवर धरले. काश्मिरात पीडीपीबरोबर भाजपची युती असल्याने आलमच्या सुटकेचे पाप त्यांच्याही माथी असल्याचा आरोप काँग्रेसने केला. मोदी यांनी काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करत काँग्रेसने आम्हाला देशप्रेम शिकवण्याच्या फंदात पडूच नये, असा टोला हाणला.
स्पष्टीकरणाने असमाधानी
*आलमच्या सुटकेबाबत काश्मीर सरकारकडे केंद्राने स्पष्टीकरण मागितले
*फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून आलमला सोडल्याचा पीडीपीचा दावा. मात्र, स्पष्टीकरणाने केंद्राचे समाधान नाही
*आलमवर २८ आरोप असून त्यातील २७ गुन्ह्य़ांमध्ये त्याला जामीन मिळाला आहे

जम्मू-काश्मीर सरकारच्या निर्णयाविरोधात देशवासीय करीत असलेल्या आक्रोशात माझाही स्वर आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान