हैदराबादमध्ये ११ ऑगस्ट रोजी एका युवक मेळाव्याला संबोधित करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेच्या आगामी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.
काँग्रेसने देशावर ५५ वर्षे राज्य करून देशाची वाट लावली. संसद ते पंचायत, महापालिका ते मुख्यमंत्री, प्रत्येक पद काँग्रेसने उपभोगले. सध्या देशाला ज्या समस्या भेडसावत आहेत, त्याला काँग्रेस जबाबदार आहे. त्यामुळेच आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे, असा प्रचार मोदी करणार असल्याचे भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.
हैदराबादमधील लाल बहादूर स्टेडियमवर युवक मेळावा आयोजित करण्यात येणार असून, ‘नवभारत युवभेरी’ (नव्या भारतासाठी युवकांचा मेळावा) असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या मेळाव्यात एक लाख लोक सहभागी होण्याची अपेक्षा असून स्टेडियमच्या जवळ असलेल्या एका मैदानात मेळाव्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी छोटा पडदा लावला जाईल.