गर्दीच्या कार्यक्रमांमुळे देशात करोनाचा धोका वाढू शकतो, असा इशारा देण्यात आलेला असतानाही मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या दिल्या. राजकीय प्रचारसभा घेण्यात आल्या, असं म्हणत वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लान्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात करोना संसर्गाचा उपद्रव झाला असून, या पार्श्वभूमीवर ‘द लान्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. करोना नियंत्रणात आणण्यापेक्षा टीकाकारांची तोंड दाबण्यास मोदींचं प्राधान्य दिसत असल्याचं असल्याचंही लान्सेटनं म्हटलं आहे.

करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोदी सरकारचं प्राधान्य हे ट्विटरवरील टीकाकारांना गप्प करण्याकडे असल्याचं दिसत आहे. तसेच संकटाच्या काळात होणारी टीका आणि खुल्या चर्चेत अडथळा आणण्याची मोदी सरकारची कृती अक्षम्य असल्याची घणाघाती टीका लान्सेटने केली आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेनं दिलेल्या इशाऱ्याचा हवाला संपादकीयमध्ये कोट करून देण्यात आला आहे. भारतात १ ऑगस्टपर्यंत करोनामुळे दहा लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज या संस्थेनं व्यक्त केलेला आहे. ”जर हे घडलं, तर या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकारचं जबाबदार असेल.”

करोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याचा धोका असलेल्या कार्यक्रमांबाबत इशारा दिलेला असतानाही सरकारने लाखो लोक गर्दी करतील अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली. राजकीय मेळावे घेतले. तर दुसरीकडे करोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा प्रचंड अभाव आहे, असंही लॅन्सेटने म्हटलं आहे. केवळ रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर करोनावर विजय मिळविल्याच्या फुशारक्या मारण्यास सुरूवात केली, हे सगळं करोनाच्या नव्या स्ट्रेनसह देशात दुसरी लाट येण्याचा इशारा दिला जात असताना सरकारने केलं. याशिवाय आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याच्या मुद्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय या संकटाला तोंड देण्याबाबतच्या सरकारच्या आत्मसंतुष्टतेवरही टीका केली गेली आहे.