उत्तर प्रदेशचे गुजरात करू या नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी खिल्ली उडवली आहे. मोदींचे हात निरपराधांच्या रक्ताने माखलेले आहेत अशा शब्दात टीकेला उत्तर दिले  आहे.
ज्या व्यक्तीच्या राज्यात असे अत्याचार झाले आहेत, त्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार कसा करणार असा सवाल येथील जाहीर सभेत बोलताना मुलायमसिंहांनी केला. गोरखपूर येथील सभेत बोलताना मोदींनी उत्तर प्रदेशचा गुजरात करू असे आवाहन केले होते. त्याला मुलायमसिंहांनी उत्तर देत चौफेर टीका केली. गुजरातमधील जातीय दंग्यांना मोदी जबाबदार असल्याचा आरोपही केला. उत्तर प्रदेश सरकारच्या कामाची तुलना गुजरातशी करावी असे आवाहन करतानाच समाजवादी पक्षाने मोठय़ा प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा केला.
समाजवादी पक्षाच्या मदतीशिवाय लोकसभा निवडणुकीनंतर एकाही पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही असा दावा मुलायमसिंहांनी केला. मोदींबरोबरच केंद्रातील काँग्रेस सरकारवरही त्यांनी टीका केली. घोटाळे आणि महागाई यामुळे अर्थव्यवस्था बिकट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.