मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जनतेचा विश्वास जवळपास कायम आहे. मात्र अनेकांनी अर्थव्यवस्था धीम्या गतीने सुरु असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020) सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्याहून अधिक सहभागी व्यक्तींनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या काळातील अर्थव्यवस्थेशी तुलना करता मोदी सरकारमधील अर्थव्यवस्थेची परीस्थिती चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. पण ऑगस्ट २०१९ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेच्या तुलनेत हा आकडा ६० टक्क्यांवरुन खाली घसरला आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात १९ राज्यातील १२ हजार १४१ लोक सहभागी झाले होते. यामधील ३० टक्के लोकांनी युपीए सरकारच्या कार्यकाळाशी तुलना करता अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या वाईट असल्याचं म्हटलं आहे. मोदी सरकारसाठी चिंतेची बाब म्हणजे युपीए सरकारला गेल्या नऊ सर्वेक्षणामध्ये मिळालेला हा सर्वोत्तम प्रतिसाद आहे.

लोकांना अद्यापही मोदी सरकारकडून अच्छे दिनची अपेक्षा असल्याचं सर्वेक्षणामधून ठळकपणे जाणवत आहे. सर्वेक्षणात सहभागी फक्त २९ टक्के लोकांनी अर्थव्यवस्था अत्यंत योग्य स्थितीत असल्याचं सांगितलं आहे. तर ६० टक्के लोकांनी अर्थव्यवस्था ढासळत असल्याचं म्हटलं आहे. २८ टक्के लोकांनी अर्थव्यवस्था स्थिर असून ना सुधरत आहे, ना ढासळत आहे असं मत नोंदवलं आहे. सर्वेक्षणात सहभागी अर्ध्याहून कमी जणांनी पाच वर्षांत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे सर्वेक्षणा २१ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान करण्यात आलं आहे. यामध्ये १९ राज्यांमधील १९४ विधानसभा मतदारसंघ आणि ९७ लोकसभा मतदारसंघातील १२ हजार १४१ जणांना सहभागी करुन घेण्यात आलं होतं. यामध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोक सहभागी होते.