विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपावासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतण्यास सुरूवात झाल्याचे दिसत आहे. आज भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मुलासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत, घरवापसी केली. त्यामुळे निवडणूक निकालानंतर भाजपासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. तर, तृणमूलमधून निवडणुकीअगोदर भाजपात गेलेले आणखी काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांच्या नावाची देखील चर्चा आहे. या पार्श्वभूमावर आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठं विधान केलं आहे.

“भाजपामधून आणखी लोकं येणार आहेत. जेव्हाजेव्हा माहिती मिळेले, तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. भाजपा व पैशांसाठी निवडणुकीपूर्वी ज्यांनी पक्षावर टीका व विश्वासघात केला त्यांचा आम्ही विचार करणार नाही. आम्ही त्याच लोकांचा विचार करू जे सभ्य, विचारी आणि कटूतेकडे झुकणारे नसतील.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तर, “मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात महत्वाची भूमिका निभवातील”, असं म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मुकुल रॉय यांचं तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे.

मुकुल रॉय यांची घरवापसी!; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह ‘टीएमसी’मध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, “मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही.” असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

“मुकुल रॉय भाजपाची अंतर्गत माहिती ‘टीएमसी’ला पुरवत होते, हे सर्वांना ठाऊक होतं”

दरम्यान, भाजपाकडून मुकुल रॉय यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. “मुकुल रॉय भाजपाची अंतर्गत माहिती टीएमसीला पुरवत होते, हे सर्वांना ठाऊक होतं” असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला बसणार मोठा झटका!

“मुकुल रॉय हे कधीच जनतेचे नेते नव्हते. पश्चिम बंगालमध्ये एसी रुममधून राजकारण करता येणार नाही. राजकारणातील त्यांचा काळ संपला आहे. कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. ते तृणमूल काँग्रेसला भाजपाची अंतर्गत माहिती देतात हे सर्वांना ठाऊक होते. जर, प्रतिस्पर्ध्याला तुमच्या नियोजनाची माहिती समजली तर, ते तुमचे नुकसान करतात.” असं पश्चिम बंगाल भाजपाचे उपाध्यक्ष अर्जुन सिंग यांनी बोलून दाखलं आहे.