मोदी सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन वर्षांच्या काळात तब्बल १.३७ करबुडव्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्रसिद्ध केली आहे. मोदी सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. ‘सीबीडीटी’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करासंबंधीच्या कारवायांमध्ये अभूतपूर्व वाढ पाहायला मिळाली आहे. या काळात महसूल विभागाने छापे आणि सर्वेक्षणांच्या माध्यमातून एकूण २३,६०४ कारवाया ( आयकर १७५२५, कस्टम २५०९, केंद्रीय अबकारी १९१३, सेवाकर ११२०) करण्यात आल्या. या माध्यमातून करबुडवेगिरीची १.३७ लाख ( आयकर ६९४३४, कस्टम ११४०५, केंद्रीय अबकारी १३९५२ ,  सेवाकर ४२७२७ ) प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी २८१४ प्रकरणांमध्ये गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला असून त्यानंतर ३८९३ जणांना अटक करण्यात आल्याचे सीबीडीटीच्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय, सक्तवसुली संचलनलयाकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ५१९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ३९६ छापे टाकण्यात आल्याचेही सीबीडीटीने म्हटले आहे. यापैकी ७९ प्रकरणांमध्ये अटक झाली असून १४, ९३३ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचेही सीबीडीटीने सांगितले. याशिवाय, आयकर विभागाने गेल्या तीन वर्षात केलेल्या कारवायांमध्ये ११५५ बनावट कंपन्यांचा पर्दाफाश झाला आहे. या माध्यमातून १३,३०० कोटींचे बनावट व्यवहारही उघड झाले होते.

[jwplayer CjcOk31X]

गेल्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने  करांच्या माध्यमातून एकूण १७.१० लाख कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. १ फेब्रुवारी २०१७ रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर महसुलापोटी १६.९७ लाख कोटींचे सुधारित उद्दिष्ट होते, ते  शंभर टक्के गाठण्यात सरकारला यश आले आहे. गेल्या वर्षी सरकारने करापोटी महसुलाच्या तुलनेत यंदा १८ टक्क्य़ांची दमदार वाढ सरकारला साधता आली आहे, असे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले होते. गत सहा वर्षांतील कर महसुलातील ही सर्वोत्तम वाढ आहे, असल्याचे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटले होते.

[jwplayer PO8srfpw]