गायींच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘पशुधन संजीवनी’ योजनेंतर्गत १५ लाखांहून अधिक गायींचे लवकरच हेल्थ कार्ड बनवले जाणार आहे. झारखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या पशुधन योजनेंतर्गत प्रत्येक गायी आणि म्हशींची प्रजनन क्षमतेची नोंद ठेवली जाणार आहे. ही योजना राबणारे झारखंड हे पहिल राज्य असल्याचे Jharkhand State Implement Agency for Cattle and Buffalo (JSIACB) चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद प्रसाद यांनी सांगितले.

झारखंडमध्ये सुमारे ४८ लाख गोवंश आहे. यापैकी ४१.९४ लाख गायी आहेत. तर १५ लाख दुभत्या गायींसह १८ लाख जनावरांना पहिल्या टप्प्यात हेल्थ कार्ड देण्यात येणार आहेत. याला पुढच्या महिन्यांत सुरुवात होणार आहे. या पशुधन संजीवनी योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वी १.५७ कोटी रुपयांची तरतुद केली होती. तर झारखंड सरकारने या योजनेसाठी १.०४ कोटी रुपये  दिले आहेत. यामध्ये या जनावरांना आधार क्रमांकाप्रमाणे १२ आकडी क्रमांक देण्यात येणार आहेत.

झारखंडमध्ये गायींना हे क्रमांक देण्याला याआधीच सुरुवात करण्यात आली आहे. केंद्राच्या information network for animal productivity and health (INAPH) या योजनेंतर्गत हे क्रमांक देण्यात आले आहेत. गोवंशाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी, त्यांची दूध क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्या आरोग्याची नोंद ठेवण्यासाठी राज्यात यापूर्वीच ७० हजार गायींना या क्रमांकांचे टॅग लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये ५०० पेक्षा अधिक पशुवैद्यक काम करीत आहेत.